सुशांतची हत्या की आत्महत्या?

 

मुंबई : वृत्तसंस्था । अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?, याचा उलगडा सीबीआयने शक्य तेवढ्या लवकर करावा असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे .

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा मुद्दा राज्यात प्रचंड गाजला होता. या मुद्यावरून अनेक राजकीय वादविवाद बघायला मिळाले. त्याचबरोबर सुशांतची हत्या झाल्याचा आरोपही करण्यात आला. नंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. मात्र, सीबीआयकडून यावर कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर मात्र उलटसुलट चर्चांचे पेव फुटले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर हत्या असल्याचंही म्हटलं होतं. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं गुढ उलगडलेलं नाही.

सीबीआयच्या तपासाबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे. “सीबीआयने तपास सुरू करून आता जवळपास पाच महिने झाले आहेत. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Protected Content