जळगाव, प्रतिनिधी जळगावच्या महापौर म्हणून सौ.भारती कैलास सोनवणे यांचा कार्यकाळ अल्प शिल्लक राहिला असला तरीही त्यांना आपल्या शहरवासियांची काळजी लागून आहे. महापौरांसह त्यांच्या कार्यालयातून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी फोनद्वारे संपर्क साधला जात असून कोरोनाचा संसर्ग वाढत असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
जळगावच्या महापौर सौ.भारती सोनवणे यांचा महापौर पदाचा कार्यकाळ दि.१८ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. महापौर पदाचा पदभार स्वीकारताच कोरोनाचा संसर्ग वाढला. कोरोना काळात महापौरांनी स्वतः बाहेर पडत आपली जबाबदारी पार पाडली. जळगाव शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातून दररोज विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला जातो आहे. नाट्यकर्मी, व्यापारी, वकील, डॉक्टर, शिक्षक व्यक्तींशी संपर्क करीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, वेळोवेळी साबणाने हातपाय धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोना होऊन गेलेल्या २५०० व्यक्तींशी केला संपर्क
जळगाव शहरात कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींशी देखील संपर्क केला जात असून त्यांना देखील खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनामुळे काय त्रास होतो याची इतरांना जाणीव करून देत कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावण्याचे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडून केले जात आहे. आजवर २५०० पेक्षा अधिक व्यक्तींशी संपर्क करण्यात आलेला आहे.
नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक
महापौरांकडून फोन करून प्रकृतीची विचारणा करून काळजी घेण्याचा सल्ला दिला जात असल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. महापौर म्हणून स्वतः रस्त्यावर येत कोरोनाशी लढा देण्याचे कार्य केल्याने अनेक नागरिक महापौरांचे आभार देखील मानत आहे. तसेच जसे आई मुलांची काळजी घेते महापौर देखील तसेच जळगावकरांच्या आरोग्याची विचारणा करून वेळप्रसंगी मदतीसाठी धावून येत असल्याची सुखद प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात.