समुद्रात उभारणार ५० हजार कोटींचा पूल

 

मुंबई : वृत्तसंस्था । दिल्ली-मुंबई हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

 

“मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वरळी-वांद्रे सी लिंक, ५५ उड्डाणपूल अशी अनेक कामे केली त्या काळात बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे सर्वजण होते. पण एक गोष्ट राहून गेली. मला वरळी-वांद्रे सी लिंक वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता. आता मी दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. त्या हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

 

“महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार असून संमती मिळाल्यास हा पूल बांधायला घेणार आहोत. त्यावर अभ्यास सुरु झाला आहे. हा पूल असता तर वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवर गर्दी झाली नसती. हा पूल झाला नाही याचं शल्य  आहे, त्यामुळे हा पूल बांधायचं डोक्यात आहे,” असंही ते म्हणाले. “मुंबईत मेट्रोच्या वरही पूल झाले असते तर वाहतुकीची कोंडी सुटली असती. पण वरळी वांद्रे सी-लिंक प्रोजेक्ट करुन रस्ता वाढवू. कारण ही मुंबईची लाइफलाइन आहे,” असं  त्यांनी सांगितलं.

 

नितीन गडकरी यांनी  सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी देण्यात आली असून यामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होईल अशी माहिती दिली. समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर २५ ते ३० लाखांची नवी पाच शहरं विकसित करण्याची आवश्यकता असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर जे टू-टायर सिटी आहेत, त्याचा विकास करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले.

 

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेमुळे वाहतूक कोंडी कमी होईल. तसंच येत्या सहा महिन्यात फ्लेक्सी इंजिन आणणार, पूर्णपणे इथेनॉलवर चालणारं इंजिन अशी माहिती त्यांनी दिली.

 

“महाराष्ट्र प्रगतीशील आणि समृद्ध राज्य आहे. त्यामुळे आपली ताकद आणि त्रुटी समजून घेण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांचा विचार करत मुंबईचा विकास केला पाहिजे. मुंबईला तिन्ही बाजूने समुद्र असून विकास होण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. नवी मुंबईतही गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील उद्योग-व्यावसायाचं महाराष्ट्रात विकेंद्रीकरण झालं तर राज्याचा विकास होईल. महाराष्ट्र सरकारने सल्लामसलत करुन पुढील २५ वर्षांचं व्हिजन डॉक्यूमेंट तयार केलं पाहिजे. महाराष्ट्र अजून पुढे जाईल आणि गरिबी, भूकबळी यातून मुक्त होईल,” असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

 

Protected Content