जळगाव प्रतिनिधी । आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी महामार्गावरील अंडरपासमध्ये तांत्रिक चुका असल्याचे सोशल मीडियातून प्रसिध्दी केल्यानंतर याची दखल घेत आज महापौर आणि स्थायी समिती सभापतींनी राष्ट्रीय महामार्ग प्रााधिकरणाच्या कार्यालयात याबाबत चर्चा केली.
बहिणाबाई उद्यान चौकालगत राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासचे काम सुरु आहे. यासाठी लोखंडी सांगाडा उभारला आहे. मात्र या कामासाठी अंडरपासच्या पृष्ठभागाची आणि रस्त्याच्या पृष्ठभागाची लेव्हल योग्य मोजली नसल्याचा दावा आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियातून वाचा फोडली होती. याची दखल महापौर आणि स्थायी समिती सभापतींनी घेतली. त्यांनी संबंधीत कामातील तांत्रिक दोष, अनावश्य होणारा भराव, चौकात विनाकारण करावा लागणारा भराव आदी विषयी पाहणी केली. यासाठी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती सुचिता हाडा, अभियंता भोळे व बर्वे हे बहिणाबाई चौकालगतच्या अंडरपास कामाजवळ आले. बर्वे यांनी त्यांना प्रत्यक्ष या बाबी दाखवून दिल्या. यानंतर सर्व मान्यवर राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाच्या कार्यालयात आले.
येथे प्राधिकरणाचे अधिकारी सिन्हा यांयासह चौपदरीकरण कामाचे सर्वेक्षक व ठेकेदारांचे प्रतिनिधीही आले. बर्वे यांनी त्यांचे तांत्रिक मुद्दे मांडले. तेव्हा सिन्हा म्हणाले, ”आम्ही सुध्दा लेव्ह घेऊनच आराखडा केला आहे.फ पण लेव्हल मागितल्या असता त्या नंतर मागवू” बर्वे म्हणाले, ”तुम्ही आज सदोष काम करुन निघून जाल. पण भविष्यात तांत्रिक दोषामुळे जळगावकरांवर अपघातांमुळे मरण ओढवेल.” यात महापौर भारती सोनवणे आणि कैलास सोनवणे यांनी सूचना केली की, दोघांच्या (बर्वे व सर्वेक्षक) यांच्या पथकाने एकत्रित लेव्हल तपासाव्यात. त्या योग्य असल्या तरच पुढे काम सुरु करावे. यावर एकमत झाले. दरम्यान सिन्हा म्हणाले, ‘चौपदरीकरण कामात ३० ठिकाणी जंक्शन होणार आहेत. तेथे अधिक जागेवर भराव होऊन चौक मोठे होतील.’
दरम्यान, नगरसेवक रियाज बागवान, जमिल शेख आदींनी लेंडी नाल्यावरील पुलाच्या खालील दोन्ही बाजूंनी भुयारी मार्ग (अंडर पास) बनविण्याचा मुद्दा मांडला. राष्ट्रीय महामार्गलगत ४५ हजार लोकांची वस्ती असताना तेथे अंडरपास का दिलेला नाही ? असा प्रश्न त्यांनी केला. अखेर खोटे नगर ते कालिंकामाता मंदिर दरम्यान महापौर, स्थायी समिती सभापती, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मनपा अभियंता, सर्वेक्षक व ठेकेदार यांनी संयुक्त पाहाणी करावी व नागरिकांची गरज लक्षात घेऊन कामात बदल करावेत अशी सूचना कैलास सोनवणे यांनी केली.