‘लालपरी’मुळे राज्यातील ३ हजार मजूर सुखरुप पोहोचले घरी

मुंबई वृत्तसंस्था । कोरोनाच्या लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये आणि राज्यातील इतर भागांमध्ये अडकलेल्या नागरिक व मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकारच्या पुढाकाराने राज्यात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिक आणि मजुरांना घरी पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. एसटीमुळे ३ हजार जण सुखरुप घरी पोहोचल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

लॉकडाउन लागू झाल्यानंतर परराज्यातील कामगारांनी घराचे रस्ते धरले. त्याचप्रमाणे इतर राज्यात असलेल्या महाराष्ट्रातील कामगारांनीही राज्याची वाट धरली. प्रवासी वाहतुकीची कोणतीही सोय नसल्यानं अनेक जण पायी निघाल्याचं दिसत आहेत. तर काहीजण मिळेल त्या वाहनानं घर जवळ करण्यासाठी धडपडताना दिसत आहे. दरम्यान, औरंगाबाद-जालना दरम्यान झालेल्या मजुरांच्या अपघातानंतर राज्य सरकारनं परराज्यात अडकलेल्या मजुरांना घरी आणण्यासाठी पाऊलं उचलली आहेत.

राज्याच्या सीमेवर अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील ३ हजार मजूरांना बसेसमुळे सुखरुपणे घरी पोहोचता आले. या सर्व प्रवासात सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्यात आले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून २५० बसेसच्या साहाय्यानं महाराष्ट्रात अडकलेल्या ५००० मजुरांना राज्याच्या सीमेवर सुखरुप सोडण्यात आलं आहे. या बसेस नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर विभागातून सोडण्यात आल्या होत्या,” अशी माहिती परब यांनी दिली.

Protected Content