मुख्यमंत्र्यांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

 

 रत्नागिरी : वृत्तसंस्था । “तुम्ही येता आणि जाता आधीदेखील येऊन गेलात. नुसत्या बाता मारता कोकणाला काही दिलं नाही. गेल्या निसर्ग वादळाचे पैसेही दिले नाहीत आणि येथे येऊन राजकीय वक्तव्य करता याचं आश्चर्य वाटतं” , असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला दिले आहे

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर असून तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथे उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत ते  वैफल्यग्रस्त नसल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसदेखील कोकण दौऱ्यावर असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

 

मोदींकडून गुजरातची पाहणी करुन जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीवर विचारण्यात आलं असता आपल्याला त्यात राजकारण आणायचं नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान संवेदनशील असून गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे त्यांनी मी विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त नाही असा टोला फडणवीसांना लगावला.

कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिलं आहे, आता शिवसेना कोकणाला किती देते या फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देताना ते म्हणाले की, “त्याची काळजी तुम्ही करु नका. कोकण आणि शिवसेनेचं नात घट्ट आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यात कमी जास्त काही होणार नाही”.

 

“त्याच्यावर मला काही राजकीय बोलायचं नाही, अन्यथा मीदेखील बोलू शकतो. पण मुख्यमंत्री आले त्याचं समाधान आहे. आम्ही त्याचं राजकारण करत नाही. पण मग जे लोक प्रश्न विचारतात की पंतप्रधान गुजरातला का गेले आणि महाराष्ट्रात का आले नाहीत? मग येथे मुख्यमंत्रीदेखील दोनच जिल्ह्यात का आले? रायगड, कोल्हापूर, साताऱ्याला का गेले नाहीत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

 

Protected Content