पाटणाः वृत्तसंस्था । . ‘मी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केलेला नाही. बिहारचे मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय एनडीएत सहभागी असलेले पक्ष घेतील. माझ्याकडून कोणताही दबाव नाही. मुख्यमंत्रिपदासाठी एनडीएच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल’, असं नितीशकुमार म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमारयांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्रीपदासंदर्भात नितीशकुमार यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांनाच झटका बसला. जागा कुणाच्या कितीही आल्या तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील, असं भाजपने निवडणुकीपूर्वी स्पष्ट केलं होतं. पण आता मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जनतेने एनडीएला बहुमत दिलं असून आम्ही सरकार बनवू. शपथविधीसंदर्भातही ते बोलले. शपथविधीबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. छठ किंवा दिवाळीनंतर याबाबत अद्याप निश्चित झालेलं नाही. आम्ही निकालाचा आढावा घेत आहोत. एनडीएतील चार मित्रपक्षांचे नेते उद्या भेटतील. यासाठी तीन ते चार दिवस लागू शकतात, असं नितीशकुमार म्हणाले.
आम्ही जेडीयूच्या कमी झालेल्या मतांच्या टक्केवारीचाही आढावा घेऊ. एलजेपीने आमच्या सर्व उमेदवारांविरुध्द आपले उमेदवार उभे केले, असं चिराग पासवानबाबत ते म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या २४३ जागांपैकी एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत. भाजपला ७४ आणि जेडीयूला ४३ जागा मिळाल्या. त्याचवेळी आरजेडीला ७५ जागा मिळाल्या आहेत आणि बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तर त्याच्या सहयोगी कॉंग्रेस पक्षाला १९ आणि डाव्या पक्षांना १६ जागा मिळाल्या आहेत. यानुसार महाआघाडीला एकूण ११० जागा मिळाल्या आहेत.