महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भरणार बीडीओंचा जनता दरबार !

मुंबई । तालुक्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता गटविकास अधिकारी आता पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार आयोजित करणार असून याबाबत शासकीय परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

प्रत्येक शुक्रवारी होणार्‍या या सभेत जनतेच्या तक्रारी, गार्‍हाणी, अडचणी सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सभेबाबत ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी ८ दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे. या सभेअंतर्गत होणार्‍या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देण्याच्या सूचना देखील परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. लोकांना या बैठकीस उपस्थित राहून थेट गटविकास अधिकार्‍यांकडे आपल्या अडचणी मांडता येणार आहेत.
जि.प. सीईओंनी सर्व गटविकास अधिकार्‍यांनी घेतलेल्या या बैठकीच्या माहितीचे संकलन करायचे आहे. ही संकलित माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवायची असून, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या सर्व माहितीचा तपशील ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे सादर करायचा आहे.

Protected Content