कोल्हापूर (वृत्तसंस्था) केंद्राने 20 लाख कोटी जाहीर केले मात्र हे कसले पॅकेज आहे? सगळे कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही. आमचे महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असे मोठे पॅकेज देईल की यांचे डोळे पांढरे होतील, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे.
महाराष्ट्रासाठी 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, या आणि अन्य मागण्यांसाठी भाजपने माझं अंगण, माझं रणांगण, महाराष्ट्र वाचवा हे आंदोलन केले होते. यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच मोठे पॅकेज जाहीर करेल. हे पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार कसे अडचणीत येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. जीएसटीचे 12 हजार कोटीची थकबाकी द्यायची होती. आज मी आकडा घेतला साडेपाच हजार कोटीची थकबाकी यायची आहे. चालू तर सोडूनच द्या. पीएम केअरमधून किती पैसे दिले? मुंबईतून सर्व पैसे पीएम केअरला गेले आणि 400 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. उत्तर प्रदेशला 1500 कोटी रुपये दिले. हा कुठला न्याय?” असा सवाल मुश्रीफ यांनी विचारला.