भुसावळ प्रतिनिधी । शहरात रात्री साडेअकराच्या सुमारास काही टवाळखोरांनी नऊ रिक्षांची तोडफोड करून चालकांना धमकावल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काही टवाळखोरांचा शहरातल्या बस स्थानकाजवळ असणार्या रिक्षा चालकांशी वाद झाला होता. याचा वचपा काढण्यासाठी तरूणांचा एक गट रात्री साडेअकराच्या सुमारास रिक्षा चालकांवर चाल करून आला. या घोळक्याने नऊ रिक्षांची तोडफोड करून चालकांना धमकावले. यामुळे या रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, यातील काही टवाळखोरांनी रिक्षाचालकांवर बंदूक ताणल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक देवीदास पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोवर टवाळखोरांनी पळ काढला होता.
मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून याच्या निषेधार्थ आज रिक्षा चालकांनी बंद पुकारला आहे.
पहा : या घटनेचा व्हिडीओ वृत्तांत.