बाळासाहेबांनीच आनंद दिघेंच्या खूनाचा कट रचला- निलेश राणे

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना नेते आनंद दिघे यांचा खून करण्याचा कट खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच रचल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे.

टिव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. ते म्हणाले की, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले. हा प्रकार दोन शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना संपवण्याचे आदेशही बाळासाहेबांनी दिल्याचा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.

या मुलाखतीत निलेश राणे पुढे म्हणाले की, नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना एक मर्यादा पाळली. बाळासाहेब ठाकरेंवर आम्ही कधीही आरोप केले नाहीत. आमच्या राणेसाहेबांचं आजही बाळासाहेबांवर प्रेम आहे मात्र ते ते व्यक्त करु शकले नाहीत. मी राणे साहेब म्हणत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावीच लागेल. दरम्यान, बाळासाहेबांनी गायक सोनू निगम याला मारण्याचा कट आखल्याचाही आरोप राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या धक्कदायक आरोपांनी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Add Comment

Protected Content