नितीश कुमार यांचं सरकार संकटात?


पाटणा : वृत्तसंस्था| नितीश कुमार यांचं सरकार त्यांच्याच पक्षातील १७ आमदार पाडू इच्छित आहेत, असा गौप्यस्फोट राजदच्या नेत्याने केला आहे. हे १७ आमदार भाजपावर नाराज असून, राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षात दाखल होतील, असं या नेत्यानं म्हटलं आहे.

बिहारमध्ये निवडणुका होऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आलं आहे. मात्र, पडद्याआड राजकीय घडामोडी सुरूच आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी हा दावा केला आहे.

संयुक्त जनता दलाचे १७ आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि लवकरच राजदमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा रजक यांनी केला आहे. “जदयूचे आमदार भाजपाच्या कार्यशैलीमुळे नाराज आहे. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार पाय उतार करण्याच्या तयारीत आहेत. भाजपामुळे नाराज असल्यानेच हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना तुर्तास त्यांना थांबवण्यात आलं आहे,” असं रजक यांनी म्हटलं आहे.

“जदयूचे हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास तयार आहेत. त्यांना आताच पक्षात घेतले, तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द होऊन आमदारकी धोक्यात येऊ शकते. पक्षांतर कायद्याप्रमाणे २५ ते २६ आमदार एकाच वेळी जदयूतून बाहेर पडून राजदमध्ये आले, तर त्यांचं सदस्यत्व कायम राहिल,” असंही रजक म्हणाले.

काही दिवसांपूर्वी भाजपाने एनडीएतील घटक पक्ष असलेल्या आणि बिहारमध्ये सत्तेत असलेल्या जदयूचे सहा आमदार फोडले. त्यामुळे जदयूमधून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. नितीश कुमार यांनीही ही नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळेच १७ आमदार नाराज असल्याचा दावा रजक यांनी केला आहे.

Protected Content