धरणगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना खते उपलब्ध होत नसल्यामुळे तसेच काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून खतांची जास्त रक्कम आकारून लुट करून साठे बाजारी करीत होते. यासंदर्भात धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कृषी अधिकारी यांना घेराव घालण्यात येणार होता. परंतू प्रांतअधिकारी विनय गोसावी व तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी मध्यस्थी करून काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी व कृषी केंद्र चालक व कृषी अधिकारी यांची संयुक्त मीटिंग घेतली आणि शेतकऱ्यांना लवकरच सर्व प्रकारचे खते उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करत सर्व कृषी केंद्र चालकांना समज दिला. विशेष म्हणजे कृषीमंत्री दादा भुसेंनी घेतली दखल घेतल्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनास यश मिळाले.
शेतकऱ्यांची लुटमार तसेच साठेबाजीविरुद्ध धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कृषी अधिकारी यांना घेराव घालण्यात येणार होता. परंतू या आंदोलनाची दखल कृषी मंत्री श्री दादा भुसे यांनी घेतली. त्यांनी त्यांच्या स्वीय साहाय्यक यांच्यामार्फत कृषी अधिकारी माळी यांना या प्रकरणात लक्ष घालून त्वरित मार्ग काढण्याच्या संदर्भात सूचना केल्या. काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी व कृषी केंद्र चालक व कृषी अधिकारी यांची संयुक्त मीटिंगच्या वेळी तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील यांनी शेतकऱ्यांना त्वरित खते उपलब्ध करून साठेबाजी करणाऱ्या व जास्त किमती आकारणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस सम्राट परिवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी व शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे, युवक अध्यक्ष गौरव चव्हाण, महेश पवार, मार्केट कमिटी संचालक मनोज कंखरे, विकास लांबोळे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, योगेश येवले, राहुल पवार, सुनील बडगुजर, सिताराम मराठे व शेतकरी उपस्थित होते.