तेजस्वी यादव यांची टपालातील मतांच्या फेर मोजणीची मागणी

 

 

पाटणा: वृत्तसंस्था । बिहार निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली. बिहारची जनता आमच्या सोबत आहे, आम्ही हारलेलो नसून आम्हाला हारवले गेले आहे, पोष्टातून आलेली मते पुन्हा मोजवी जावीत अशी मागणीही तेजस्वी यादव यांनी केली.

जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. सन २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला, असे तेजस्वी यादव म्हणाले.

उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. पुन्हा मते मोजणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे. सन २०१५ मध्ये देखील नीतीश कुमार यांनी जनादेशाचा अपमान केला होता. नीतीश कुमार यांना खुर्ची प्यारी आहे. हे लोक कपटाने खुर्ची मिळवतात. जनतेने आमचा रोजगाराचा मुद्दा स्वीकारला. जनतेच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. आम्ही हारलेलो नसून जिंकलेलो आहोत आणि आता आम्ही धन्यवाद यात्रा काढणार आहोत. मी बिहारच्या लोकांना धन्यवाद देतो, असे तेजस्वी पुढे म्हणाले.

एनडीएला एक कोटी ५७ लाख मते मिळाली. म्हणजेच ३७.३ टक्के मते एनडीला मिळाली आहेत. मात्र महाआघाडीला एक कोटी ५६ लाख ८८ हजार ४५८ मते मिळाली. महाआघाडीला३७.२ टक्के मते मिळाली. एनडीए आणि महाआघाडीमध्ये केवळ १२ हजार मतांचा फरक आहे, असे तेजस्वी म्हणाले.

एनडीए सरकारने वचन दिल्या प्रमाणे काम केले नाही, आंदोलन छेडले जाईल असे विरोधी पक्षाचा नेता निवडले गेल्यानंतर तेजस्वी म्हणाले. सरकारने १९ लाख नोकऱ्या दिल्या नाहीत, बिहारच्या लोकांना औषधे, सिंचन, शिक्षण आणि रोजगार दिला नाही, तर महाआघाडी मोठे आंदोलन छेडेल असे तेजस्वी म्हणाले. निवणडणुकीत गडबड झाल्याचा आरोपही तेजस्वी यांनी केला आहे. एकूण १० जागांवर गडबड झाली असून येथे पुन्हा मतमोजणी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Protected Content