तरुण पुजाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

 

जळगाव, प्रतिनिधी ।शहरातील जुने जळगाव रोड परिसरात योगेश्‍वर नगरलगत असलेल्या तुळजाई नगर येथील साई गणेश मंदिरात बोअरवेल सुरु करत असतांना विजेच्या जोरदार धक्क्याने अनुपम मोहन प्रसाद (वय २५ रा. योगेश्‍वर नगर) या तरुण पूजार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना आज १३ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मूळ मध्यप्रदेशातील सटना येथील रहिवासी अनुपम प्रसाद हे सात वर्षापासून तुळजाई नगर येथील साईगणेश या मंदिरात पूजारी म्हणून काम पाहत आहेत. योगेश्‍वर नगरात भाडे करारावर खोलीत वास्तव्यास आहेत. आईवडील गावाकडे असल्याने तसेच अनुपम प्रसाद हे अविवाहित असल्याने एकटेच राहत होते. रविवारी सकाळी अनुपम प्रसाद पूजा करण्यासाठी तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात आले. याठिकाणी स्वच्छता केल्यानंतर मंदिराच्या आवारात असलेल्या झाडावर लटकविलेल्या डीपीवर बोरअरवेलचे बटन दाबण्यासाठी गेले असता, त्यांना जोरदार धक्का लागला. यात ते खाली कोसळले व जागीच त्याचा मृत्यू झाला. रोज सकाळी ७ वाजता आरती होते. आरतीसाठी नेहमीप्रमाणे मंदिराजवळ राहत असलेल्या विमल अशोक कुदळ या मंदिरात आल्या असता, त्यांना पूजारी प्रसाद हे पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लाकडी फळीने तसेच झाडूच्या सहाय्याने प्रयत्न करुन वीजप्रवाह खंडीत केला व तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देवून यादव यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांना त्यांना मृत घोषित केले. प्रकाराची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथ महाजन यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. तसेच पंचनामा केला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी दिपक जाधव यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तुळजाई नगरात महापालिकेचे श्री संत संताजी जगनाडे महाराज नावाचे उद्यान आहे. याच उद्यानात २०१२ साली साईगणेश मंदिराचे बांधकाम झाले तेव्हापासून या मंदिरावर अनुपम प्रसाद हेच पूजारी म्हणून काम पाहत होते. काल दि. १२ डिसेंबर रोजी या मंदिराचा वर्धापनदिन होता. पूजारी प्रसाद यांच्या हस्ते पूजाविधी होवून महाप्रसादाचे वाटप झाले होते. व रविवारी सकाळी दुर्दवी घटना घडली. दरम्यान प्रकाराबाबत महापालिकेला कळविण्यात येवून डीपीवरील पूरवठा खंडीत करण्याबाबत सांगण्यात आले. मात्र सात उलटूनही वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.

Protected Content