जेलमध्ये गेल्यानंतर भावना उफाळून येतातच ! : ना. गिरीश महाजन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांनी ईडी कोठडीत जाण्यापूर्वी आपल्या मातेला लिहलेल्या पत्रावर मंत्री ना. गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे.

कालच खासदार संजय राऊत यांचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले होते. ईडीच्या कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून त्यांनी आपल्या आईला अतिशय भावनाशील असे पत्र लिहले होते. या पत्रानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सत्ताधार्‍यांकडूनही उत्तर दिलं जात आहे. राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांनीदेखील यावर भाष्य केले आहे.

याप्रसंगी ना. गिरीश महाजन म्हणाले की, राऊत यांनी पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यात काही हरकत नाही. भेट घेण्याची मागणी केली तर त्यांना भेटताही येईल. त्यांची भेट झाली तरी काही हरकत नाही. त्यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल मला फारशी माहिती नाही. पण त्या भेटायला जाऊ शकतात. पत्रात काय लिहावं हा त्यांचा प्रश्न आहे. जेलमध्ये गेल्यावर भावना उफाळून येत असतात. सगळ्याच आरोपींच्या बाबतीत आपण हे पाहिलं आहे. तसंत त्यांनीही मत व्यक्त केलं असेल, असे ना. गिरीश महाजन म्हणाले.

Protected Content