जळगाव मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील मृत्यदर शून्य!; महापौर यांची माहिती (व्हडिओ )

जळगाव, प्रतिनिधी । शहर महानगरपालिका प्रशासनाकडून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मनपा प्रशासनाकडे तोडकी यंत्रणा असली तरी मनपा प्रशासन घेत असलेल्या मेहनतीमुळे बहुतांश रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात असून मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील मृत्यूदर शून्य असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे. जळगाव शहरात रुग्ण दररोज वाढत असले तरी १६०० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीने मनपाकडून तयारी करून ठेवण्यात आली असल्याचेही महापौरांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महापौर भारती सोनवणे यांनी सर्व यंत्रणेचा आढावा घेऊन मनपातील दालनात पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी त्या बोलत होत्या. परिषदेला नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.विजय घोलप उपस्थित होते. कोविड विरुद्धच्या लढाईत मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, डॉ.संजय पाटील, डॉ.शिरीष ठुसे, डॉ.नेहा भारंबे, डॉ.मनिषा उगले यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहे. तसेच रेडक्रॉस संस्थेचे विनोद बियाणी, सुभाष सांखला, उज्ज्वला वर्मा यांचे सहकार्य लाभत आहे.

अडचणी अनेक परंतु तरीही अविरत सेवा
कोरोना हटावसाठी मनपा प्रशासनाचे ४७८ अधिकारी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. कायम डॉक्टर ६, आरसीएच अंतर्गत ५ डॉक्टर, ५१ परिचारिका, ९ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, १३७ शिक्षक, १२० आशा सेविका, १५० अंगणवाडी सेविका हे अनेक ठिकाणी सेवा देत आहे. सेवा बजावताना प्रत्येकाला काही न काही कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांच्या घरी दुःखद घटना घडल्या तर काहींचे मुले लहान आहेत. अनेक अडचणी असल्या तरीही कुणीही सुट्टी न घेता आपली सेवा बजावत आहे.

मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील १४० रुग्ण झाले बरे
जळगाव मनपाकडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. जळगाव शहरात आजपर्यंत २९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले असून त्यापैकी २४ रुग्ण मयत झाले तर १४० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज जळगाव शहरातील ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये आजवर १९८ रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी १०४ रुग्णांवर मनपा प्रशासनाकडून पुर्णतः उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. सध्या ५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची घेतली जाणारी काळजी, दक्षता यामुळे त्याठिकाणचा मृत्यूदर शून्य असल्याची बाब मनपा प्रशासनासाठी महत्वाचे आहे. भविष्यात देखील हा मृत्यूदर शून्यच राहील असा विश्वास महापौर भारती सोनवणे यांनी व्यक्त केला.

हाय रिस्कमधील व्यक्तींना दाखल करून घेण्यासाठी मनपाकडून व्यवस्था
जळगाव शहरात भविष्यात रुग्ण वाढू शकतात अशी शक्यता गृहीत धरून मनपा प्रशासनाकडून यापूर्वीच उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मनपाने अधिग्रहित केलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये ३००, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये १८० तसेच इकरा महाविद्यालयात १८० हाय रिस्क व्यक्तींना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर
मनपा प्रशासनाकडून दि.२० मे २०२० रोजी १६३ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल करून घेण्याची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर आज जळगाव महानगरपालिकेचे आहे. जळगाव शहरात जर अधिक रुग्ण वाढले तर काही हॉटेल्स देखील अधिग्रहित केल्या जाणार असून तशी तयारी मनपाकडून करण्यात आलेली आहे. भविष्यात आणखी काही रुग्ण वाढले तर त्यांना उपचारार्थ दाखल करण्याची उपाययोजना देखील मनपा प्रशासनाने केलेली आहे.

शहरात ८० प्रतिबंधित क्षेत्र
जळगाव शहरात दररोज रुग्ण वाढत असून त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्र देखील वाढत आहे. आज शहरात ८० प्रतिबंधित क्षेत्र आहेत. एखादा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर १४ दिवसांनी तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र मुक्त होऊ शकतो. परंतु त्या कालावधीत त्या परिसरात एकही रुग्ण आढळून यायला नको, असे शासनाचे निर्देश आहेत.

शहरातील दीड लाख नागरिकांची तपासणी पूर्ण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मनपाकडून सध्या ३९२ पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. एखादे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर झाल्यानंतर पथकाकडून सलग १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांची तपासणी केली जाते. आजवर शहरातील ३२,८३८ कुटुंबातील १ लाख ४६, २४१ लोकांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात आली आहे. मनपा प्रशासनाची मोहीम दररोज सुरूच असून जसजसे प्रतिबंधित क्षेत्र वाढत आहेत तसे पथक देखील वाढवण्यात येत आहे.

बाहेरगावच्या रुग्णांवर देखील उपचार
मनपा प्रशासनाच्या कोविड केअर सेंटरमध्ये अमळनेर, भुसावळ, जळगाव ग्रामीण याठिकाणच्या देखील रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. मनपाच्या सीसीसी सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मिळणारी सेवा, चहा पानी, नाश्ता, जेवणाचा दर्जा उत्तम असल्याची प्रतिक्रिया कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांनी व्यक्त केली. महापौर स्वतः दररोज फोन करून माहिती घेत असल्याने अनेकांनी महापौरांचे आभार व्यक्त केले.

मनपाच्या अधिकाऱ्यांनी घेतले १६०० स्वॅब
जळगाव मनपाच्या २ वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वब घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इतर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षित केले. आजवर जळगाव शहरातील १६०० व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी १३०० व्यक्ती या हाय रिस्क गटातील होत्या. त्यात १५५ रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आले. काल मनपाच्या कोविड केअर सेंटर मधील स्वॅब घेतलेल्या केवळ ६८ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच मनपा प्रशासनाकडून १६०० व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

महापौर दररोज घेतात आढावा, रुग्णांची करतात विचारपूस
मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होणारे पॉझिटिव्ह रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या मोबाईलवर महापौर दररोज संपर्क करून त्या ठिकाणी असलेल्या सुविधांची माहिती घेतात. तसेच रुग्णांना मानसिक आधार देऊन ते लवकर बरे होऊन घरी जाण्यासाठी शुभेच्छा देखील देतात. कोविड केअर सेंटरमध्ये जर कशी असुविधा असल्या तर त्या सोडविण्यासाठी महापौर संबंधितांना तात्काळ आदेश देतात. महापौर कार्यालयाकडून देखील रुग्णांना फोन करून विचारणा करण्यात येते.

सामाजिक संस्थाचा मनपासोबत पुढाकार
जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण भविष्यात वाढल्यास मनपा प्रशासनाने आपली तयारी करून ठेवलेली आहे. रुग्ण वाढल्यानंतर क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या देखील वाढेल, त्यांची व्यवस्था देखील मनपाकडून केली जाणार आहे. क्वारंटाईन व्यक्तींची व्यवस्था कार्यांसाठी जळगावातील केशव स्मृती प्रतिष्ठानने तयारी दाखवली असून त्यांच्याशी त्याबाबत प्राथमिक बोलणे देखील झाले आहे. येणाऱ्या काळात रुग्ण संख्या वाढली आणि क्वारंटाईन व्यक्तींसाठी सामाजिक संस्था पुढे आल्या तर मनपा प्रशासनाकडून त्याबाबत देखील विचार केला जाईल, अशी माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी
जळगावात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मनपा प्रशासन सतर्क असले तरी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखावी. नागरिकांनी विनाकारण आणि किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडू नये, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1185423745145614/

 

Protected Content