चाक बदलण्यासाठी थांबलेल्या तरुणांना टेम्पोने उडवलं; चार ठार

 

 

बीड : वृत्तसंस्था । बीड – उस्मानाबाद मार्गादरम्यान तेरखेडा गावाजवळ गाडीचं चाक बदलण्यासाठी थांबलेल्या भाविकांना टेम्पोने उडवल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी १७ जण मालेगाव येथून निघाले होते. मालेगाव येथून टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपती कडे जात असताना बीड – उस्मानाबाद दरम्यान तेरखेडा गावाजवळ या गाडीचे मागील चाक पंक्चर झाले होते. गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन चाक बदलत असताना मागून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने उभ्या असलेल्या युवकांना उडवले. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. हे सर्व प्रवासी दरेगाव, वडगाव व सायने (मालेगाव) येथील आहेत. जखमींना उस्मानाबाद येथील खासगी व सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

 

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील १७ भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघाले होते. मालेगाव येथून टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपतीकडे जात असताना बीड -उस्मानाबाद दरम्यान तेरखेडा गावाजवळ या गाडीचे मागील चाक पंक्चर झाले होते. गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन चाक बदलत असताना बीडकडून उस्मानाबादच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने उभ्या असलेल्या युवकांना जोरदार धडक दिली.

 

या अपघातात टेम्पोतील शरद विठ्ठल देवरे (४४), विलास महादू बच्छाव (४६), जगदीश चंद्रकांत दरेकर (४५) सतीश दादाजी सूर्यवंशी (५०) हे चौघे जागीच ठार झाले. तर संजय बाजीराव सावंत (३८), भरत ग्यानदेव पगार (४७) व गोकुळ हिरामण शेवाळे (३८) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उस्मानाबादच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.  चालकाविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content