खून प्रकरणी सहा जणांना जन्मठेप; दोन महिलांचा समावेश

भुसावळ प्रतिनिधी । रेवती (ता. बोदवड) येथील मुलाचा खून केल्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी. भन्साली यांनी दोन महिलांसह ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत ३० हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.

या बाबत माहिती अशी की, रेवती येथील दीपक सुदाम पारधी (वय १६) याला १९ अ‍ॅाक्टोबर २००७ रोजी किरकोळ कारणावरून ११ संशयितांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात ११ जणाविंरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन अल्पवयीन मुले आहे. हा खटला जळगाव येथील जिल्हा न्यायालयात सुरू होता. भुसावळ येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाल्यावर हा खटला भुसावळ न्यायालयात वर्ग करण्यात आला. न्यायाधीश एस. बी. भन्साली यांच्यासमोर खटल्यातील आठ जणांची साक्ष नोंदवली. यात दीपक याचा भाऊ विजय पारधी, वडील सुदाम पारधी यांच्यासह तपासाधिकारी पी. बी. जाधव, जी.एस. मोरे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. आरोपींचे वकील आणि सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायाधीश भन्साली यांनी बुधवारी शिक्षेचा निकाल दिला. या खटल्यात सुपडू अर्जून भील (वय ३६), गोपीनाथ बुधा भील (वय ३८), दीपक छगन भील (३७), सुनील रामू भील (वय २९), ध्रुपदाबाई अर्जून भील (वय ५६), मैनाबाई गोपीनाथ भील (वय ३५) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यात मैनाबाई भील व गोपीनाथ भील हे दोन्ही पती-पत्नी आहे. न्यायाधीश भन्साली यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपींना अश्रू अनावर झाले. सरकारतर्फे अ‍ॅड. विजय खडसे यांनी काम पाहीले.

Protected Content