नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टातील खटल्याचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नसून राज्यात लवकरच नवीन मंत्र्यांचा शपथविधी होईल असे प्रतिपादन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात सत्ता स्थापन होऊन महिन्यापेक्षा अधिकचा झाला असून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नये असे सांगितलेले नाही. सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नसून, तुमच्या विचाराआधी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, राज्याचे अधिकार सचिवाकडे दिल्यानंतर विरोधी पक्ष टीका करताना पाहायला मिळत आहे त्यावर बोलताना, फडणवीस म्हणाले की, जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरीता डॉयलॉगबाजी करण्यात येते. याआधीच्या सरकारमध्ये देखील सचिवांना ते अधिकार होते. याआधी आमच्या सरकारमध्ये देखील अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. अर्धन्यायिक प्रकरणे वगळता मंत्रिस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत असे देखील फडणवीस म्हणाले.