कोरोना लस टोचून घेणे ऐच्छिक

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ‘कोव्हिड १९’ साठी लसीकरण करून घेणे ऐच्छिक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारतात तयार करण्यात आलेली लस इतर देशांनी तयार केलेल्या लशीइतकीच परिणाकारक असेल, अशी ग्वाहीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

एखाद्याला पूर्वी कोरोनाची लागण झाली असेल किंवा नसेल तरीही लशीची पूर्ण मात्रा घेणे आवश्यक आहे, तरच विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती तयार होईल. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी आवश्यक त्या अँटिबॉडीज तयार होतात, असा सल्लाही मंत्रालयाने दिला आहे.

इतर लशींप्रमाणे या लशीचेसी काही साइड इफेक्ट आहेत. काहींना ही लस घेतल्यानंतर हलका ताप, वेदना होऊ शकतात. याबद्दल योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत. २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यायचे आहेत. कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा सर्व रुग्णांनी ही लस घ्यायची आहे. या गटातील लोक हाय रिस्क प्रकारांत येत असल्याने त्यांनी लस घेणे आवश्यक आहे.

सरकारने लशीची उपलब्धता ध्यानात घेऊन प्राधान्याने लसीकरण करायच्या व्यक्तींचे गट तयार केले आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेत आघाडीवर काम करणारे तसेच ५०हून अधिक वयोगटातील लोकांचे लसीकरण केले जाईल. संबंधित व्यक्तींना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर लसीकरणाचे ठिकाण व वेळेबाबत कळवले जाईल.

लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाबाबतची माहिती संबंधित व्यक्तीला मोबाइलवर एसएमएस पाठवून कळवली जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, पॅन कार्ड, बँक अथवा पोस्टाचे पासबुक, पासपोर्ट, पेन्शन डॉक्युमेंट, नोकरीतील ओळखपत्र आणि मतदार ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र नोंदणीसाठी आवश्यक आहे. लसीकरण झाल्यानंतरही संबंधित व्यक्तीला एसएमएसवर कळवले जाईल. दोन्ही डोस दिल्यानंतर क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र मोबाइलवर पाठवले जाईल.

सुरक्षा म्हणून लसीकरण झाल्यानंतर किमान अर्धा तास केंद्रावर थांबावे, असा सल्लाही मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर त्रास झाला तर तातडीने आरोग्य अधिकारी किंवा आशा सेविकेला माहिती देणे आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित वावर ही त्रिसूत्री कायम ठेवावी, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

लसीच्या चाचण्या अद्याप विविध टप्प्यांमध्ये असून लवकरच ही लस वापरासाठी तयार होईल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या सात विविध लशी दृष्टिपथात आहेत. त्यातील एक भारत बायोटेकने ‘आयसीएमआर’सोबत विकसित केली आहे. दुसरी झायडस कॅडिला यांनी, तिसरी जेनोव्हा, चौथी ऑक्सफर्डची सीरम इन्स्टिट्यूटने चाचण्या घेतलेली लस, पाचवी स्पुटनिक व्ही व्हॅक्सिन जी डॉ. रेड्डी लॅब रशियाच्या जमालेया नॅशनल सेंटरसोबत तयार केली आहे आणि सहावी बायोलॉजिकल ई. लि. हैदराबादने अमेरिकेतील’एमआयटी’सोबत विकसित केली आहे.

Protected Content