जिनिव्हा (वृत्तसंस्था) भारतातील जवळपास सात कंपन्या कोरोना लस विकसित करण्याच्या जवळपास पोहचल्या आहेत. मात्र, संपुर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन लस उपलब्ध होण्यासाठी सहा ते ९ महिन्याचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी वर्तवला आहे.
अनेक ठिकाणी कोविड-१९ लस तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यात भारत बायोटेक ही कंपनी १५ ऑगस्टपर्यंत लस विकसित करेल, असा दावा केला जात आहे. मात्र, लसीवरील मानवी चाचण्या आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लस उपलब्ध होण्यासाठी किमान १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागेल. जर सर्व सुरळीत झाले तर लसीच्या फेज १ ते फेज ३ पर्यंत किमान सहा महिने लागतील, असे डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या. दरम्यान, भारत बायोटेक ही कंपनी १५ ऑगस्टपर्यंत लस विकसित करण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५ ऑगस्टच्या भाषणामध्ये मोठी घोषणा करता, यावी म्हणून लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत घाई केली जात असल्याचे म्हटले होते.