कोरोना लसीची वेळ नक्की सांगता येणार नाही — मोदी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना लस कधीपर्यंत येणार, त्याची वेळ आम्ही ठरवू शकत नाहीत’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. राजकीय वर्तुळात लशीसंबंधात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांच्या पार्श्वभूमीवर मोदींचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय.

लस कधीपर्यंत येणार हे आम्ही ठरवू शकत नाहीत तर हे वैज्ञानिकांच्या हातात आहे’, असं मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हटलंय. काही लोक यासंबंधी राजकारण करत आहेत परंतु कुणालाही राजकारण करण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना आणि आपल्याच पक्षातील वाचाळ नेत्यांना लगावला.

कोरोना स्थितीसंबंधी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील सहभागी झाले होते. केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी मात्र सहभाग टाळला. बैठकीत गृहमंत्री अमित शहा हेदेखील सहभागी झाले होते.

बैठकीची सुरुवात गृहमंत्री अमित शहा यांनी आपलं म्हणणं मांडून केली. युरोप-अमेरिकेसारख्या देशांत सक्रमणानं पुन्हा वेग घेतलाय. अशावेळी आपल्याला सावध राहायला हवं. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य करायला हवा. आगामी दिवसांत मुख्यत्वे दिल्ली, केरळ, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी, असं शहा यांनी म्हटलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एका टास्क फोर्सचं गठन करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. ही टास्क फोर्स राज्यात कोविड लशीच्या वितरणावर काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. याशिवाय आपण सीरम इन्स्टिट्युटच्या अदार पुनावाला यांच्या संपर्कात असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

संकटादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींकडे जीएसटीची थकबाकी राज्यांना देण्याचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र सरकारनं राज्यांना जीएसटीची थकबाकी त्वरीत द्यावी, यावर त्यांनी जोर दिला.

Protected Content