कोरोना उपचार करताना दगावलेल्या डॉक्टरांना शहीद दर्जा द्या

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनामुळे सामान्यांबरोबरच अनेक डॉक्टरांनाही प्राण गमावावा लागला आहे. रुग्णसेवा करताना संसर्ग झाल्याने शेकडो डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पहिल्या फळीतील या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना कोरोनायोद्धा म्हणावे असं सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र या आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना शहीद म्हटले जात नाही. आता यावरुनच देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या दुहेरी भूमिकेवरुन आयएमएने हा ढोंगीपणा असल्याचा टोला लगावला आहे.

आयएमएकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३८२ डॉक्टरांची यादी असून ही यादीही केंद्र सरकारला पाठवण्यात आली असून या डॉक्टरांना शहीद दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. एकीकडे सरकार आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना कोरोनायोद्धे म्हणते आणि दुसरीकडे कोरोनामुळे रुग्णसेवा करणाऱ्या किती जणांचा प्राण गेला हेही सरकारला ठाऊक नाही, असं म्हणत आयएमएने सरकारी धोरणांबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

संसदेमध्ये सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. कोरोनाशी लढा देताना किती डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले यासंदर्भातील आकडेवारी सरकारने जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र आपल्याकडे मृत्यूमुखी पडलेल्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांच्या मृत्यूची आकडेवारी नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.
३८२ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची आमच्याकडे आकडेवारी असताना संसदेमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय हा राज्य सरकारचा विषय असल्याचे सांगत कोणतीच आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगत आहे हे आश्चर्यकारक असल्याचे आयएमएने म्हटलं आहे. हा प्रकार म्हणजे युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांची आकडेवारी ठाऊक नसण्यासारखाच आहे, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी, “दुखद अंतकरणाने आम्ही ही चिठ्ठी लिहिली आहे. देशसेवा करण्यासाठी झटत असलेले माझे सहकारी असणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांची ही विडंबना आहे. आम्ही राज्यांंतर्गत येणारा विषय असू तर यापेक्षा आमची अधिक विडंबना काय असू शकते,” असं म्हटलं आहे.

Protected Content