कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ विचित्र अपघात ; दुचाकीवरील अनोळखी तरूणीचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळील समर्थ शाळेनजीक झालेल्या विचित्र व भीषण अपघातात अनोळखी तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील दोन जण तसेच रिक्षातील चालक व चार महिला प्रवाशी जखमी झाल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना खासगी व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

जळगाव ते कानळदा रोडवरील समर्थ शाळेजवळ सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता विचित्र अपघात झाला. महेश गोकूळ जोशी रा. पिंप्री ता. धरणगाव हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय ९९०३) ने कानळदा रोडवरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत दुचाकीवर अनोळखी महिला आणि २२ वर्षीय तरूणी बसलेले होते. कानळदा गावाजवळील समर्थ शाळेसमोरून जात असतांना वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारला. यात दुचाकीस्वार महेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तिघे रस्त्यावर पडले. तेवढ्यात जळगाव शहराकडून येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८०७०) ने रोडवरील तिघांना चिरडले व रिक्षा देखील पलटी झाली. या रिक्षातील प्रवाशी विमलबाई चौधरी, मंगलाबाई चौधरी, सुनिता चौधरी, राधाबाई चौधरी आणि रिक्षा चालका रविंद्र भावलाल पाटील सर्व रा. आव्हाणे ता.जि.जळगाव हे जखमी झाले. यावेळी रस्त्यावर विचित्र अपघात झाल्याने काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती. खासगी वाहनातून दुचाकीवरील तीनही जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुचाकीवरील तिघा जखमींपैकी अनोळखी तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  तर दुचाकीस्वार महेश जोशी आणि अनोळखी महिला यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content