काँग्रेससोबत आघाडी करून सगळं संपलं

बंगरुळू : वृत्तसंस्था । कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी “भारतीय जनता पार्टीसोबत असतो, तर आतापर्यंत आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. पण काँग्रेससोबत आघाडी करून जे काही कमावलं होतं, ते सगळं संपलं,” असा संताप व्यक्त केला आहे.

मैसूरमध्ये एका कार्यक्रमात कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “मी आता सुद्धा मुख्यमंत्री असतो, जर भाजपासोबतचे संबंध चांगले ठेवले असते तर. मी २००६-२००७ मध्ये आणि १२ वर्षांच्या काळात जे काही मिळवलं होतं. मी ते सगळं काँग्रेससोबत आघाडी करून संपवून टाकलं,” असं कुमारस्वामी म्हणाले.

“मी २००-०७ मध्ये मुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील जनतेचा विश्वास संपादित केला होता. तो विश्वास पुढचे १२ वर्षे टिकवून ठेवला. पण, काँग्रेसची साथ पकडल्यानंतर सगळं काही गमावून टाकलं. २०१८ मध्ये काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर सिद्धारामैय्या आणि त्यांच्या समर्थक गटाने माझी प्रतिष्ठा संपवून टाकली. मी फक्त त्यांच्या जाळ्यात फसत गेलो, कारण देवेगौडा यांच्यामुळे आघाडीसाठी सहमत होते,” असं कुमारस्वामी म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी २०१८मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस व जनता दल सेक्युलरने एकत्र येऊन कर्नाटकात सरकार स्थापन केलं होतं. यावेळी एच.डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती.

काही महिने सरकार चालवल्यानंतर दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. पण, या निवडणुकीनंतर काँग्रेस व जेडीएस यांच्यातील आघाडीत मतभेद निर्माण झाले. काही आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं होतं.

Protected Content