बुलढाणा प्रतिनिधी । एकोप्याने राहिले तरच पक्ष वाढतो, एकमेकांचे पाय ओढण्यात अर्थ नाही असे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. ते राष्ट्रवादी संवाद यात्रेत बुलढाणा येथील कार्यक्रमात बोलत होते.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संवाद यात्रा काल बुलढाण्यात आली. या निमित् आयोजीत कार्यक्रमात माजी मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनाही आमंत्रीत करण्यात आले. त्यांनी प्रारंभी जयंत पाटील यांचे स्वागत केले. याप्रसंगी एकनाथरा खडस म्हणाले की, मला गेल्या अनेक वर्षांचा संघटना चालवण्याचा अनुभव आहे. एकोप्याने राहिलं तर पक्ष वाढतो, एकमेकांचे पाय ओढण्यात अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक चांगले पदाधिकारी थांबले आहेत. कोविडमुळे त्यास विलंब झाला असला तरी लवकरच त्यांचा पक्षप्रवेश करण्यात येईल, असे खडसे म्हणाले.
बुलडाणा जिल्ह्याची सामाजिकरित्या, राजकीयरित्या मला चांगली माहिती असल्याने पक्ष कुठे कमकुवत आहे, कुठे बलाढ्य आहे याची मला जाण आहे. त्यामुळे जिथे आपण कमकुवत आहोत तिथे लक्ष केंद्रीत करायला हवे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले आहेत. त्यांच्या विरोधात जनमानसाला सोबत घेऊन आंदोलन करायला हवे. महाविकास आघाडी चांगलं काम करत आहे. सरकार आपलं असलं तरी लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करा, शासन दरबारी दाद मागा. आदरणीय खा. शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारखे मार्गदर्शक आपल्याकडे आहेत. आपण एकजुटीने पक्ष वाढीसाठी एक व्यापक कार्यक्रम हाती घेऊ, असे आवाहन खडसे यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, संदिप बाजोरीया, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, विनायक पाटील, बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अॅड नाझिर काझी, महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे, युवक जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भुषण दाभाडे, युवती जिल्हाध्यक्ष मिरा बावस्कर, बुलडाणा विद्यार्थी अध्यक्ष नरेश शेळके, अॅड. सरदार आणि इतर पदाधिकारी उपथित होते