एका केंद्रीय मंत्र्याला डच्चू, ८ राज्यपाल बदलले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांची मंगळवारी कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली अन्य तीन नेत्यांना राज्यपाल केले गेले आहे. चार राज्यात फेरबदल करण्यात आले आहेत.

 

राष्ट्रपती भवनातर्फे आठ राज्यांत राज्यपाल नियुक्त किंवा फेरबदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी आणखी बऱ्याच केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. अनेक मंत्र्यांना संघटनेत तर काही मंत्र्यांंना घटनात्मक पद दिले जाऊ शकते. यासह अनेक मंत्र्यांचे विभाग बदलण्याचेही वृत्त आहे.

 

नवीन राज्यपालांमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरमचे राज्यपाल म्हणून आंध्र प्रदेशचे भाजप नेते डॉ. हरि बाबू कंभपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत गुजरात भाजप नेते मंगूभाई पटेल यांना मध्य प्रदेशचे राज्यपाल केले गेले आहे. गोवा भाजपा नेते राजेंद्र आर्लेकर यांची देखील हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली गेली.

 

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली. त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंड राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली. यासोबत हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुरात तर मिझोरमचे राज्यपाल पी.एस. पिल्लई यांची गोवा राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली.

 

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावर चंद्र गहलोत सध्या मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आंध्र प्रदेशात आहेत. त्यांनी राज्यपाल पदी नियुक्ती केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

 

गहलोत म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद तसेच उच्च नेतृत्व यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करत मला कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. मी त्यांची इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मी उद्या भाजपच्या प्राथमिक सदस्यता, राज्यसभेचे सदस्य आणि मंत्री पदाचा राजीनामा देईन,”

 

थावरचंद गहलोत हे मध्य प्रदेशातील आहेत. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. यासह ते भाजपच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्यही आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द मध्य प्रदेशातून सुरू केली. ते तीन वेळा मध्य प्रदेश विधानसभवर आमदार म्हणून निवडले गेले. यानंतर त्यांनी केंद्रीय राजकारणात उडी घेतली. गेहलोत हे चार वेळा लोकसभेचे खासदारही निवडले गेले.२०१४ मध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. यानंतर २०१९ मध्ये पुन्हा केंद्रात मोदी सरकार स्थापन झाले, त्यावेळेस देखील त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.

 

Protected Content