इव्हीएम हॅकींगमुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या ?

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची इव्हीएम हॅकींग उघड होऊ नये म्हणून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आज एका हॅकरने केल्याने खळबळ उडाली आहे.

इव्हीएम हॅकिंगबाबत माहीती जगजाहीर होऊ नये म्हणून भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा सय्यद शुजा या हॅकरने लंडनमध्ये सुरू असलेल्या मईव्हीएम हॅकेथॉनमध्ये केला. इव्हीएम कशाप्रकारे हॅक केलं जाऊ शकतं, याचं प्रात्यक्षिकही त्याने या हॅकेथॉनमध्ये दाखवलं. सय्यद शुजा म्हणाला की, ईव्हीएम ब्ल्यूटूथ आणि वायरलेस फ्रिक्वे्सीच्या माध्यमातून हॅक केलं जाऊ शकत नाही. ग्रेफाइटवर आधारित ट्रान्समीटरच्या साह्यानेच ईव्हीएम उघडलं जाऊ शकतं. हे ट्रान्समीटर २०१४ च्या निवडणुकीत वापरण्यात आले होते. ईव्हीएम हॅक करण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून भाजपला मदत केली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांना निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम हॅकिंगची पूर्ण कल्पना होती. ते याचा भंडाफोड करतील, अशी भीती काही भाजप नेत्यांना वाटत होती. त्यामुळेच त्यांची हत्या घडवून आणण्यात आली आणि तो अपघात दाखवण्यात आला. एनआयएचे एक अधिकारी तंजिल अहमद यांना हा सगळा प्रकार माहीत होता. ते एफआयआर दाखल करणार होते. मात्र, नंतर त्यांनी आत्महत्या केली असा दावादेखील त्याने केला.

दरम्यान, ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं, हा दावा भारताच्या निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. भारतात ज्या ईव्हीएमचा वापर निवडणुकीसाठी केला जात आहे ती पूर्णपणे सुरक्षित आहेत. या मशीन हॅक केल्या जाऊ शकत नाहीत. भारत इलेक्ट्रॉनिक अँड कार्पोरेशन ऑफ इंडियाने कडेकोट निरीक्षणाखाली या मशीनची निर्मिती केलेली आहे. या सर्वावर २०१० मध्ये नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीचंही लक्ष होतं, असे निवडणूक आयोगाने नमूद केले. तर, भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला.

Add Comment

Protected Content