
मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिला नाही. गाजावाजा करुन कर्जमाफी केली. मात्र दोन महिन्यात केवळ १५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. महिन्याला केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 400 महिने लागतील, असे गणित देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.
भाजपने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झाल्यावर सभागृहाबाहेर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत होते. ज्या गावात शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या, त्या गावातील ३५ टक्केही शेतकरी कर्जमाफीत येत नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांवरील अत्याचार थांबावावे, यासाठी सभागृहाचे कामकाज आम्ही बंद पाडल, असे फडणवीसांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, सरकार ठोस पावलं उचलत नाही, तोपर्यंत आमचा पवित्रा कायम राहील, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.