जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये उत्कृष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या चार नात्यांमध्ये स्त्रीचे संपूर्ण विश्व सामावलेले आहे. या चार नात्यांमुळे कुटुंब उभे राहते, संस्कार रुजतात आणि समाजाचे भविष्य घडते. महाराष्ट्राची भूमी जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी पावन केलेली आहे. या भूमीत स्त्री केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नसून समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे.

ते पुढे म्हणाले की, आज प्रशासनासह विविध क्षेत्रांमध्ये महिला आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने स्वतःची कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महिला अबला नसून सबला आहे. समाजाचे रक्षण असो किंवा संस्कृतीची जपणूक असो, महिलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. “नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगताना पालकमंत्र्यांनी नमूद केले की, स्त्री आरोग्यदृष्ट्या सक्षम असेल तर संपूर्ण कुटुंब आणि समाज निरोगी राहतो. महिलांनी आयुष्यातील अडचणींना सामोरे जात सकारात्मकतेने जीवन जगावे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मुख्यमंत्री कन्यादान योजना, सुकन्या समृद्धी योजना, लाडकी बहीण योजना तसेच महिला बचत गट अनुदान योजना यांमुळे महिलांना आर्थिक व सामाजिक बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन यांसारख्या विकास योजनांमध्येही महिलांचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. त्यामुळे आज महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळाली असून त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शासनाच्या योजना घराघरांत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि बचत गटातील महिला करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाने महिलांना विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज महिला स्वावलंबी होत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, महिला आई, बहीण, पत्नी अशा विविध भूमिकांमधून कुटुंब आणि समाज सांभाळत असते. घर, नोकरी, व्यवसाय, कुटुंबातील ज्येष्ठांची सेवा, मुलांची काळजी अशा अनेक जबाबदाऱ्या महिला सांभाळत असतात. त्यामुळे महिलेला अष्टभुजेचे रूप म्हटले जाते. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांची आर्थिक प्रगती होत असून त्यांनी विविध क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले की, महिलांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळत विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र या सर्वांसोबत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांतील महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



