जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भोंगळ कारभाराविरोधात मनविसेने आवाज उठविला आहे. विद्यापीठ प्रशासनाने अलीकडेच प्रसिद्ध केलेले महत्त्वाचे अध्यादेश आणि परिपत्रके केवळ इंग्रजी भाषेत काढल्याने मनविसेने तीव्र संताप व्यक्त केला असून, हा थेट मराठी भाषेचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
विद्यापीठाने ७ जानेवारी रोजी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. मात्र, हे दोन्ही दस्तऐवज पूर्णपणे इंग्रजी भाषेत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते समजणे कठीण झाले आहे. यासंदर्भात मनविसेच्या शिष्टमंडळाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. “महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असताना आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण व आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असताना, विद्यापीठ इंग्रजीचा अट्टाहास का धरत आहे?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

मनविसेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी प्रशासनावर ताशेरे ओढताना सांगितले की, इंग्रजीतील क्लिष्ट नियमांमुळे सामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नियमावलीच समजली नाही, तर विद्यार्थी त्यांचे हक्क कसे मांडणार? हा प्रकार म्हणजे मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय असून मनसे हे कदापि खपवून घेणार नाही.
मनविसेने निवेदनाद्वारे प्रशासनासमोर तीन मुख्य मागण्या ठेवल्या आहेत: यात वादग्रस्त परिपत्रके आणि अध्यादेशांचे तातडीने मराठीत भाषांतर करून ते प्रसिद्ध करावेत. भविष्यातील सर्व संवाद, नोटीस आणि पत्रव्यवहार केवळ मराठीतच असावेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेचा अवलंब करावा. अशी मागणी केली आहे. जर विद्यापीठ प्रशासनाने या मागण्यांवर त्वरित सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.



