Home राजकीय आरक्षण सोडतीमुळे ठाकरेंचा महापौर बसण्याची शक्यता? २२ तारखेला ठरणार मुंबईचे सत्तासूत्र

आरक्षण सोडतीमुळे ठाकरेंचा महापौर बसण्याची शक्यता? २२ तारखेला ठरणार मुंबईचे सत्तासूत्र


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. इतर महापालिकांमध्ये वातावरण तुलनेने शांत असले तरी मुंबई महानगरपालिकेत मात्र राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. २२ तारखेला होणारी महापौर पदाची आरक्षण सोडत मुंबईच्या सत्तासमीकरणाला नवे वळण देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर आपलाच उमेदवार बसावा, अशी अपेक्षा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, तिसरी आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या गटालाही पुन्हा एकदा मुंबईच्या तख्तावर आपला महापौर बसवायचा आहे. स्पष्ट बहुमत कुणालाही मिळालेले नसल्याने, महायुती आणि ठाकरे गट-काँग्रेस यांच्यातील संभाव्य युतीच्या शक्यतांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

महापौर कोणाचा होणार, हे संपूर्णपणे २२ तारखेला होणाऱ्या आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे. त्यामुळेच या सोडतीकडे सर्व पक्षांचे बारकाईने लक्ष आहे. या सोडतीत अशी एक शक्यता निर्माण झाली आहे की, कोणतीही मोठी राजकीय खेळी न करता उद्धव ठाकरे यांचा महापौर आपसूकच निवडून येऊ शकतो. “देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल,” या उद्धव ठाकरे यांच्या विधानामागे दडलेले हेच राजकीय आणि तांत्रिक गणित असल्याचे बोलले जात आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीनुसार मुंबईतील काही जागा विशिष्ट समाजांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. एकूण २२७ नगरसेवकांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी महिलांचा समावेश आहे. याशिवाय अनुसूचित जमातीसाठी दोन आणि अनुसूचित जातीसाठी १५ जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

निवडणूक निकालानंतर महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या जागांवर भाजप आणि शिंदे गटानेही उमेदवार दिले होते, मात्र ठाकरे गटाच्या शिलेदारांनी महायुतीसह काँग्रेसलाही मागे टाकत विजय मिळवला. विशेष म्हणजे या दोन जागांपैकी एक एसटी महिला आणि एक एसटी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होती आणि दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत.

प्रभाग क्रमांक ५३ मधून जितेंद्र वळवी तर प्रभाग क्रमांक १२१ मधून प्रियदर्शनी ठाकरे यांनी विजय मिळवला आहे. २०२३ च्या अधिसूचनेनुसार महापौर पद हे रोटेशन पद्धतीने दिले जाणार आहे. त्यामुळे महिला खुल्या प्रवर्गानंतर आता हे पद एससी, एसटी किंवा ओबीसी प्रवर्गाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. जर महापौर पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले, तर बहुमत असूनही भाजप आणि शिंदे शिवसेना यांना महापौर बसवणे शक्य होणार नाही आणि ठाकरेंचा मार्ग सुकर होऊ शकतो.


Protected Content

Play sound