Home Cities अमळनेर अमळनेरात पहाटे पाणीपुरवठा; वेळ बदलण्याची मागणी

अमळनेरात पहाटे पाणीपुरवठा; वेळ बदलण्याची मागणी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला परिसरात पहाटे ४ वाजता होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गैरसोयीच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी युवा नेते नईम पठाण यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या कसाली मोहल्ला भागात पहाटे ४ वाजता पाणीपुरवठा केला जातो. ही वेळ रहिवाशांसाठी विशेषतः महिलांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरत आहे. पहाटेच्या वेळी झोपेतून उठून पाणी भरण्यासाठी जावे लागत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होत आहे. लहान मुलांना सांभाळत महिलांना पाणी भरण्यासाठी जावे लागते, जे कष्टाचे आणि काही प्रमाणात असुरक्षितही आहे.

नागरिकांनी पाणीपुरवठ्याची वेळ बदलून सकाळी ७ ते ९ किंवा संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महिलांना व कुटुंबांना होणारा त्रास कमी होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या मागणीसाठी युवा नेते नईम पठाण, अफरोज मिस्त्री, इस्त्याक मौलाना, जुनेद शेख, राजा पठाण व रिजवान मन्यार आदींनी पुढाकार घेतला आहे. नगरपरिषद प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound