जळगाव, लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी : शहरालगत असलेल्या मोहाडी शिवारातील एकलव्य नगर भागात आज मंगळवार, ७ एप्रिल रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान मोठा थरार पाहायला मिळाला. गेल्या २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांनी या कारवाईला कडाडून विरोध केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जेसीबी पाहताच आदिवासी बांधव आक्रमक
मोहाडी शिवारातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवर एकलव्य नगर ही झोपडपट्टी वसलेली आहे. ही अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यासाठी महापालिकेचे पथक तीन जेसीबींसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कारवाईची चाहूल लागताच एकलव्य नगरातील महिलांसह शेकडो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले. “आम्ही गेल्या दोन दशकांपासून येथे राहत आहोत, आमच्या झोपड्या पाडण्यापूर्वी आम्हाला पर्यायी जागा द्या,” अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली.

प्रशासन आणि आंदोलकांमध्ये जुंपली
आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने महापालिका कर्मचारी आणि आदिवासी बांधवांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. “काहीही झाले तरी जागा खाली करणार नाही,” असा पवित्रा घेत आदिवासी बांधवांनी पथकासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे परिसरात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलकांची प्रमुख मागणी:
“आम्ही मागील २० वर्षांपासून या भागात राहत आहोत. प्रचलित कायद्यानुसार ही जागा आमच्या नावावर करून देण्यात यावी. शासनाने आमची पर्यायी जागेवर व्यवस्था केल्याशिवाय इथून हटणार नाही.”
प्रशासनाची नरमाई, चर्चेचे आश्वासन
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आणि महिलांचा वाढता विरोध लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने नमती भूमिका घेतली. प्रत्यक्ष झोपड्यांवर कारवाई न करता केवळ परिसरातील झाडेझुडपे आणि साफसफाई करून पथकाने माघार घेतली.
यावेळी महापालिकेचे सहा. उपायुक्त उदय पाटील यांनी मध्यस्थी करत आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आदिवासी बांधवांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले असून, तणाव निवळण्यास मदत झाली



