Home Cities अमळनेर अवकाळी पावसाने बळीराजावर पुन्हा संकट — आ. अनिल पाटील यांची तात्काळ पंचनाम्याची...

अवकाळी पावसाने बळीराजावर पुन्हा संकट — आ. अनिल पाटील यांची तात्काळ पंचनाम्याची मागणी!


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमळनेरसह परिसरातील अनेक गावांमध्ये सततचा पाऊस आणि वाऱ्यामुळे उभ्या तसेच कापणीस तयार झालेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. खरीप हंगामात आधी पावसाने दिलेला दगा आणि नंतर झालेली अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी धक्कादायक ठरली असतानाच आता या अवकाळी पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर अमळनेरचे आमदार आणि राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी राज्याचे सध्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना पत्र लिहून तात्काळ पंचनामे करण्याची आणि शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण ८१,२१२ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ४६,९४८ हेक्टरवरील कपाशी, २९,४१२ हेक्टरवरील मका, ३,५४४ हेक्टरवरील ज्वारी, ७४७ हेक्टरवरील बाजरी आणि २०० हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे गंभीर नुकसान झाले आहे.

आमदार पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, शासनाच्या विद्यमान नियमांनुसार केवळ उभ्या पिकांचाच पंचनामा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची कापणी झालेली पिके शेतात पडून राहिली असून अवकाळी पावसामुळे ती पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे या पिकांचाही ‘विशेष बाब’ म्हणून पंचनाम्यात समावेश करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“बळीराजाच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. शासनाने संवेदनशीलतेने तात्काळ पावले उचलावीत आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा निर्णयांची अंमलबजावणी करावी,” असे आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी प्रशासनाला आदेश देत पंचनामे त्वरित सुरू करून मदत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही दिले आहेत.

दरम्यान, अमळनेर तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केले असून, जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे आणि मदतकार्य लवकरात लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन आणि ज्वारी पिकांचे उत्पादन कोसळल्याने शेतकरी वर्गात हतबलता दिसून येत आहे.


Protected Content

Play sound