केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का; उशिरा कार्यालयात आल्यास हाफ डे मानला जाईल

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कार्यालयात उशीरा येणाऱ्या आणि लवकर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. केंद्र सरकारने बेशिस्त सरकारी कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका देण्याच्या तयारीत आहे. सरकारने अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 15 मिनिट उशीरा येण्याची परवानगी असणार आहे.

देशातील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात सकाळी 9.15 वाजत पोहोचावे लागणार आहे. कार्यालयात फक्त वेळेवर यावे लागणार नाही तर तिथे बायोमेट्रिक सिस्टमध्ये पंच देखील करावं लागणार आहे. अधिकारी ते कर्मचारी सर्वांसाठी हा नियम लाग असणार आहे. कोरोनानंतर अनेक कर्मचारी बायोमेट्रिक पंच करत नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, जर कर्मचारी सकाळी 9.15 पर्यंत कार्यालयात आले नाहीत तर त्यांचा अर्धा दिवस (हाफ डे) मानला जाईल. कोणत्याही कारणास्तव एखाद्या विशिष्ट दिवशी कर्मचारी कार्यालयात येऊ शकला नाही, तर त्याची माहिती त्याला अगोदर द्यावी लागेल. जर आपत्कालीन परिस्थितीत रजा आवश्यक असेल तर त्यासाठीही अर्ज करावा लागेल. आता सर्व विभाग आपल्या कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती आणि वेळेवर येण्या-जाण्यावर लक्ष ठेवणार आहेत. केंद्र सरकारची सर्व कार्यालये सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र कनिष्ठ कर्मचारी उशिरा येणे आणि लवकर निघून जाणे हे सर्रास घडताना दिसत आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीचा फटका सर्वसामन्य नागरिकांना बसताना दिसत आहे. त्यांची कामे वेळेत होत नाहीत.

Protected Content