बकरी ईदसाठी जात असताना अपघातात दोन जणांचा मृत्यू, सहा जण जखमी

नंदूरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अक्कलकुवा तालुक्यातील कौली गावाजवळ डंपरची दुचाकीस्वारांना धडक बसल्याने दोघांचा मृत्यू तर, सहा जण जखमी झाले. घटनास्थळी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पोलीस प्रशासनाने जखमींना खासगी वाहनातून अक्कलकुवा रुग्णालयात हलविले. यामुळे संतप्त नातेवाईकांनी दोन तास महामार्गावर ठिय्या दिला. पोलीस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

अक्कलकुवा तालुक्यातून अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग जातो. या महामार्गावर नेत्रंग-शेवाळी दरम्यान सोमवारी कौली गावाजवळ अपघात झाला. बकरी ईद निमित्ताने हमजा शरीफ अक्राणी आणि रेहान रज्जाक पठाण हे दुचाकीवरुन नातेवाईकांना भेटण्यास जात होते. सेलंबा येथून निघालेल्या या दुचाकीस्वारांना मागून येणाऱ्या डंपरची धडक बसली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर डंपर चालक पसार झाला.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमी आणि मयतांना खासगी वाहनातून अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी दोन तासांहून अधिक काळ रास्तारोको केला. पोलिसांनी कुटुंबीय,नातलगांची समजूत काढली. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर आमच्या नातेवाईकांचे प्राण वाचले असते, असे यावेळी मयतांच्या नातेवाईकांने सागितले. मयत दोघेही गुजरातच्या सीमावर्ती भागातील सेलंबा येथील रहिवासी होते.

Protected Content