भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालून संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी येथील भारतीय रेल्वे तिकीट तपासणी कर्मचारी संघटनेने येथील रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना एक निवेदन दिले आहे. तसेच तिकीट तपासणी विभागातील सगळे कर्मचारी आज (दि.१६) या घटनांचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम करीत आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, ११ मे रोजी मुंबई विभागाचे कर्मचारी धर्मेश कदम यांनी एका विना तिकीट प्रवाशाला येथील रेल्वे पोलीस ठाण्यात आणले असता तेथील अधिकाऱ्याने कारवाई करण्याऐवजी त्याला सोडून दिले. तेव्हा कदम यांनी आक्षेप घेतला असता त्या अधिकाऱ्याने त्यांनाच मारहाण केली. दुसऱ्या घटनेत १३ मे रोजी दानापूर विभागाचे कर्मचारी पंकजकुमार यांना एक रेल्वे पोलीस कर्मचारी फर्स्ट ए.सी. डब्यात अनधिकृतपणे प्रवास करताना आढळून आला. त्यांनी त्यावर आक्षेप घेतला असता त्या पोलिसाने पंकजकुमार यांना मारहाण करीत बळजबरीने पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्याच्यावर कारवाई न करता उलट यांच्यावरच तक्रार न करण्यासाठी दबाव आणला. या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडीओही काढलेला आहे. या घटना बघता रेल्वे पोलीस दलात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कुणालाही जुमानात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. असेही या निवेदनात म्हटले आहे.