यंदा महाराष्ट्रात मान्सून पूर्ण क्षमतेने बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. नैर्ऋत्य मौसमी वारे म्हणजेच मान्सून अलिकडील काही वर्षांमध्ये प्रथमच वेळेत आणि जवळपास पूर्ण क्षमतेने दाखल झाला आहे. परिणामी महाराष्ट्रात यांदा बळीराजासाठी ‘अच्छे दिन’ येणार असल्याची चिन्हे आहेत. आयएमडीने हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी वातावरण पोषक असल्याने मान्सून पूर्ण क्षमतेने बरसेल. दरम्यान, आयएमडीच्या अंदाज वास्तवात उतरत असल्याचे दिसत असून राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसताना दिसतो आहे. परिणामी, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर यांसह पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर यांसह राज्यातील विविध भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढचे चार दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? घ्या जाणून..

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 4 दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच ७ जून सिंधुदूर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. याशिवाय कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशच्या भागातही मान्सून पुढे सरकत असून प्रगतीपथावर आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरमध्ये बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे एकूणच कामगिरी पाहता मॉन्सून समाधानकारक आहे. आयएमडीने मॉन्सूनच्या प्रवासाबद्दल सांगताना म्हटले की, रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयानगरम भागात आजही मान्सूनची सीमा पाहायला मिळते आहे.

वातावरण पोषक असल्याने आणि सध्यास्थितीत तर कोणताही अडथळा नसल्याने मान्सून महाराष्ट्रात पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आणखी पुढे सरककण्याची चिन्हे आहेत. तो पुढे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांचा संपूर्ण भाग व्यापेल असाही अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला हाच मान्सून तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आपल्या कवेत घेईल, अशी शक्यता आहे.

राज्यातील हवामान मान्सूनसाठी पोषक असल्याने पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. परिणामी आयएमडीने महाराष्टात पुढचे चार दिवस विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागात पुढील 4 दिवसात दमदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीकडून नागरिकांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान, शेती आणि बळीराजासाठी महत्त्वाचे मानले जाणारे मृग नक्षत्रही सुरु झाले आहे. मृगावरचा पाऊस शेतकऱ्यांना महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे मृग नक्षत्रावर पडणाऱ्या पावसावर विश्वास ठेऊन शेतीमध्ये बियाणे पेरणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिसासा मिळाला आहे.

Protected Content