Home Cities जळगाव “दिलेला शब्दच ठरला आयुष्याचा टर्निंग पॉईंट”; डॉ. प्रकाश आमटे

“दिलेला शब्दच ठरला आयुष्याचा टर्निंग पॉईंट”; डॉ. प्रकाश आमटे


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “माझ्या वडिलांनी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवशील का, असा प्रश्न विचारला आणि मी ‘हो’ म्हणून दिलेला शब्दच माझ्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट ठरला,” असे भावनिक प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे सन २०२० बॅचचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

समारंभाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर पद्मश्री डॉ. मंदाकिनी आमटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, रुग्णालय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते. डीन डॉ. सोळंके यांनी शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांची माहिती देत २०२० ची बॅच पद्मश्री डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या उपस्थितीमुळे भाग्यशाली असल्याचे सांगितले.

ग्रामीण भागात आजही आरोग्य सेवेची मोठी गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. मंदाकिनी आमटे यांनी केले. प्रेम, त्याग आणि करूणेने रुग्णांची सेवा करणे हेच खरे वैद्यकीय तत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पदवी हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून ती केवळ मिरवण्यासाठी नसून जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे, असे सांगत त्यांनी नवोदित डॉक्टरांना किमान एक-दोन वर्षे ग्रामीण भागात सेवा देण्याचे आवाहन केले.

डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या आयुष्याचा संघर्षमय प्रवास कथन करत गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे वडील पद्मश्री बाबा आमटे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत असताना आलेल्या अडचणींची आठवण करून दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आदिवासी आणि ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणे हेच आपले खरे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. “हृदयात देश आणि नजरेत रुग्ण ठेवून वैद्यकीय तत्त्वांची प्रामाणिक अंमलबजावणी करा,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या दीक्षांत समारंभात १५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. पदवी स्वीकारताना अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटलेले दिसून आले. वरुण नन्नवरे, सारा पटेल, अनिरुद्ध टेणपे, श्रुती सिंग, अमित साखरे, बुशरा खान, चिंतन चौधरी या विद्यार्थ्यांसह गीता कांबळे व नितीन राय या पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. अधिरथ बॅचच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound