फुलगांव शिवारातील शेतकऱ्यांची वाट झाली बिकट

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती शिवारातील रस्ते तयार करण्याचा कामाला प्राधान्य दिले जात आहे . मात्र, फुलगांव व पिंप्रीसेकम भागातील शेतकऱ्यांच्या शेताची वाट बिकट झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना अडचणीवर मात करीत शेती शिवार गाठावे लागत असल्याने दिपनगर प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे .

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमालाची शेतीच्या बंधाऱ्याहून थेट बाजार पेठेत सुलभ वाहतुक व्हावी यासाठी शेती शिवारातील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाला प्राधान्य दिले जात आहे . मात्र, तालुक्यातील फुलगांव येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती फुलगांव व पिंप्रीसेकम शिवारात असुन या शेती शिवाराकडे एक फुलगांव ते पिप्रीसेकम तर दुसरा फुलगांव ते दिपनगर विज निर्मितीकडे कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे मार्गाजवळून जाणारा असे दोन मार्ग आहेत . मात्र,या पैकी दिपनगर विज निर्मितीकडे कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे मार्गालगतच्या मार्गाची दहा ते बारा वर्षापासून प्रकल्पाच्या माध्यमातून दुरुस्तीच झाली नसल्याने या मार्गाच्या दोन्ही बाजुच्या साईड पट्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे . तसेच रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात चाळण झाल्याने या मार्गावरून मार्गक्रमण करणारे दुचाकीधारक शेतकरी, कर्मचारी यांना मोठ्या कसरतीने या मार्गावरून रात्री – अपरात्री मार्गक्रमण करावे लागत आहे . इतकेच नव्हे तर शेती कामासाठी बैलगाडीने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैलाच्या खुरानांही इजा व जख्मा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तिव्र प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे . मात्र, शेतकऱ्यांच्या या समस्येकडे दिपनगर विज निर्मिती प्रकल्पाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच लोक प्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने संतापयुक्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे . यामुळे दिपनगर विज निर्मितीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे .

शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल नाही

फुलगांव ते दिपनगर विज निर्मिती प्रकल्पाकडे जाणाऱ्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असुन रस्त्या लगतच जलवाहीनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे . यामुळे या खोदकामाची मातीही रस्त्यावर आली असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखलं निर्माण होत असुन याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे . यामुळे या भागातील शेतकरी रविंद्र भागवत कोल्हे, वासुदेव पी . चौधरी, विकास पाटील यांचेसह किमान ५० शेतकऱ्यांनी विज निर्मिती प्रकल्पाचे प्रकाशगड येथील चेअरमन यांचेकडे रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन व अर्ज दिला आहे.

मात्र, अद्यापही या शेतकऱ्यांच्या या मागणीची अद्यापही दखल घेण्यात आली नाही . तर याबाबतीत संबंधीत शेतकऱ्यांनी तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या समोर आपल्या व्यथा व्यक्त केल्या असता त्यांनी तातडीने मुंबई येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले .

Protected Content