Home राजकीय मुंबईत जन्माचा मुद्दा तापला ; मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना खोचक प्रतिप्रश्न?

मुंबईत जन्माचा मुद्दा तापला ; मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना खोचक प्रतिप्रश्न?


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुंबईत जन्माला आल्याशिवाय शहरातील प्रश्न कळत नाहीत, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हसतच, पण तितक्याच तीव्र शब्दांत प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना उलट सवाल केला असून, हा मुद्दा आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर भाष्य केले. ‘मुंबई समजून घ्यायची असेल तर मुंबईतच जन्म घ्यावा लागतो, नागपूरचे मुख्यमंत्री मुंबई समजू शकत नाहीत,’ या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी मिश्किलपणे हसत प्रतिक्रिया दिली. “यापेक्षा मोठं नैराश्य दुसरं काय असू शकतं?” असे म्हणत त्यांनी या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

याच मुद्द्यावर पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जर एखादं शहर किंवा देश समजण्यासाठी तिथे जन्म आवश्यक असेल, तर उद्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जन्म घ्यायला हवा? देश समजण्यासाठी संपूर्ण देशात जन्म घ्यायचा का, असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला. गुजरातमध्ये जन्मलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अंदमानपर्यंत देशाची असलेली सखोल जाण कोणालाही नाकारता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

राज ठाकरेंवर थेट टीका करताना फडणवीस म्हणाले, “समजा एका मिनिटासाठी मी मान्य केलं की मला मुंबई कळत नाही आणि तुम्हाला कळते. मग इतक्या वर्षांत तुम्ही काय केलं? मुंबईतील मराठी माणसासाठी काय केलं?” असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील मराठी माणसाला घर घेण्यासाठी शहराबाहेर जावं लागलं, यावर सत्तेत असताना काय उपाययोजना केल्या, याचे उत्तर देण्याचे आव्हानही त्यांनी दिले.

मुंबई महानगरपालिकेचा २५ वर्षांचा कार्यकाळ आठवत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या काळात कोणत्या ठोस पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या, याचा हिशेब दिला पाहिजे. मुंबईत पहिल्यांदा नागपूरहून आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५५ उड्डाणपूल बांधले, वांद्रे-वर्ली सी लिंक उभी केली आणि त्यातूनच मुंबईच्या विकासाला गती मिळाली, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आपल्या कार्यकाळात तसेच एकनाथ शिंदे यांच्या काळातही विकासकामे वेगाने झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“आम्ही मुंबईत जन्मलो नाही, हा काही आमचा दोष नाही,” असे ठामपणे सांगत फडणवीस म्हणाले की, मुंबईत जन्मलेल्यांनी आधी त्यांच्या सत्ताकाळात काय केले याचा हिशेब द्यावा. केवळ जन्माच्या आधारावर नेतृत्वाची क्षमता मोजणे योग्य नसून, कामगिरीवरूनच निर्णय व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

एकूणच, मुंबईत जन्माच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता थेट विकासकामे, मराठी माणसाचे प्रश्न आणि सत्तेतील जबाबदारीपर्यंत पोहोचला असून, आगामी काळात हा मुद्दा राजकीय तापमान आणखी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound