जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अयोध्या-प्रयागराज महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविकांचे मोठे नुकसान झाले आहे. देवदर्शनाहून परत येणाऱ्या टूरिस्ट बसला पहाटे वेगाने येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने एक महिला भाविक ठार झाली असून ११ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर जळगाव जिल्हा प्रशासन तातडीने हालचालीला लागले असून मदत आणि बचाव कार्य तत्काळ सुरू करण्यात आले आहे.

शनिवारी पहाटे ४ वाजता हा अपघात झाला. धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील ३० महिला आणि ५ पुरुषांचा गट अयोध्या येथे सहलीला गेला होता. परतीच्या प्रवासात सुलतानपूरजवळ त्यांची बस भीषण अपघातग्रस्त झाली. यात पिंप्राळा (ता. जळगाव) येथील छोटीबाई शरद पाटील (वय ५५) या महिलेचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. बसमध्ये एकूण ४४ भाविक प्रवास करत होते, ते सर्व जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते.

अपघातानंतर तत्काळ सुलतानपूर स्थानिक प्रशासनाने जखमींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही सातत्याने संपर्क ठेवून स्थितीचा आढावा घेत असल्याची माहिती दिली.
जखमी भाविकांच्या परतीच्या प्रवासाची जबाबदारीही जळगाव प्रशासनाने स्वीकारली आहे. रेल्वेचे तिकीट तातडीने काढून देण्यात आले असून मयत झालेल्या महिलेच्या मृतदेहाला तिच्या नातेवाईकांसोबत जळगावात आणण्यासाठी ॲम्बुलन्सची तातडीने व्यवस्था केली आहे. ही ॲम्बुलन्स दुपारपर्यंत जळगावकडे रवाना झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या संपूर्ण परिस्थितीवर जळगावचे पालकमंत्री, संबंधित मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हाधिकारी सतत लक्ष ठेवून आहेत. सुलतानपूर स्थानिक प्रशासन आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्यात सातत्याने संपर्क ठेवून मदत आणि उपचार प्रक्रियेला वेग देण्यात येत आहे.



