मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसुरक्षा मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्स आणि राज्य सरकारच्या मृदा व जलसंधारण विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये १,५०० अतिरिक्त जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक-खाजगी-समुदाय सहभागातून १,४५० हून अधिक जलसाठ्यांचे संवर्धन करण्यात आले असून ३,००० कोटी लिटरपेक्षा जास्त जलसाठवण क्षमता निर्माण झाली आहे. या उपक्रमाचा थेट लाभ सुमारे सात लाख ग्रामीण नागरिकांना झाला आहे. यामुळे अनेक भागांमध्ये टँकरवरील अवलंबित्व कमी झाले असून शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे.

या उपक्रमाचा पुढील टप्पा नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभागात राबविण्यात येणार आहे. भूजल पातळी वाढविणे, सिंचन सुविधा सुधारणे आणि दीर्घकालीन जलसुरक्षा निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून विकेंद्रित आणि समुदाय-आधारित उपाययोजना राबविण्यात येत असून टाटा मोटर्सचा सहभाग राज्याच्या जलव्यवस्थापन प्रयत्नांना अधिक बळ देणारा आहे.
टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की, शाश्वत जलव्यवस्थापनासाठी सरकारी योजना, समुदायाचा सहभाग आणि दीर्घकालीन सहयोग यावर कंपनीचा भर आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी Naam Foundation यांच्या भागीदारीत केली जात आहे.
एकट्या २०२५ मध्ये कंपनीने २५ जिल्ह्यांमध्ये १,००० जलसाठ्यांचे संवर्धन करून २,२५० कोटी लिटर अतिरिक्त जलसाठवण क्षमता निर्माण केली. या उपक्रमामुळे शेतकरी आता अधिक पीक घेऊ लागले असून महिलांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळही कमी झाली आहे. तसेच जलसाठ्यांमधील गाळ काढून तो शेतात वापरल्याने जमिनीची सुपीकताही वाढत असल्याचे सांगण्यात आले.



