Home क्राईम सेल्फी घेणे जिवावर बेतले : नागपूरच्या विद्यार्थिनीचा समुद्रात बुडून मृत्यू, एक बेपत्ता

सेल्फी घेणे जिवावर बेतले : नागपूरच्या विद्यार्थिनीचा समुद्रात बुडून मृत्यू, एक बेपत्ता


चेन्नई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आयटी कंपनीच्या इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तिघे जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना चेन्नई येथे घडली असून या दुर्घटनेत नागपूरच्या मयुरी चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. जय पाटील हा विद्यार्थी अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे, तर राज केदारी याला सुदैवाने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयटी कंपनीच्या इंटर्नशिपसाठी एकूण २६ विद्यार्थी चेन्नईत गेले होते. यापैकी केवळ तीन विद्यार्थी समुद्रात उतरले होते. सहकाऱ्यांसोबत सेल्फी घेत असताना अचानक समुद्राच्या लाटांचा वेग वाढल्याने तिघेही खोल पाण्यात ओढले गेले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच स्थानिक प्रशासन व बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या दुर्घटनेत नागपूरची मयुरी चौधरी हिला बाहेर काढण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जय पाटील हा विद्यार्थी अद्याप सापडलेला नसून त्याचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दल आणि स्थानिक यंत्रणा प्रयत्नशील आहेत. राज केदारी याला मात्र वेळीच मदत मिळाल्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधून बचावकार्याबाबत माहिती घेतली आहे. त्यांनी तामिळनाडू सरकारने सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती केली असून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे. प्रशासनाकडून सातत्याने शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जय पाटीलचे नातेवाईक चेन्नईत दाखल झाले असून मयुरी चौधरीचे कुटुंबीय नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. रुग्णालय परिसरात आणि समुद्रकिनारी चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या दुर्घटनेमुळे इंटर्नशिपसाठी गेलेल्या इतर विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Protected Content

Play sound