जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात नुकताच सुधर्मा ज्ञानसभेच्या वतीने “जगू या आनंदे” या सुंदर सकारात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना जीवनातील आनंद, प्रेम आणि सकारात्मक विचारांची ओळख करून देणे हा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यवस्थापक राजेंद्र कुंवर यांनी सुधर्मा संस्थेची ओळख वृद्धांपर्यंत पोहचवली व संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमात सुधर्मा संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे उपस्थित होते. त्यांनी जीवनात आनंद आहेच, मात्र तो अनुभवता आणि भोगता येणे आवश्यक आहे, असे सांगत ज्ञानेश्वरीच्या ९ व्या अध्यायातील श्लोक वाचून त्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी उदाहरणाद्वारे सांगितले की गाईच्या आचळाच्या पलीकडे गोड दूध असते, मात्र गोचिडाला त्याचा रस चाखता येत नाही; तसेच चिखलाच्या मध्ये कमळ असते, मात्र बेडूकाला त्याचा सुगंध व मध समजत नाही, कारण त्याला चिखल पसंत असते. याच प्रकारे प्रत्येकाच्या हृदयात मी आत्मराम रूपाने असताना लोक विषय सुखाच्या मागे धावत राहतात, जे क्षणभंगुर असते, असा सखोल संदेश त्यांनी कार्यक्रमात दिला.

या आध्यात्मिक विवेचनानंतर आजी-आजोबांनी कार्यक्रम अत्यंत आवडल्याचे व्यक्त केले व सकारात्मकतेची अनुभूती घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक राजेंद्र कुंवर यांनी आभार मानले तर सौ. सुनिता बेलसरे, श्रेयस बेलसरे आणि नितीन तायडे यांनी आयोजनात परिश्रम घेतले



