Home आरोग्य १०० टक्के ब्लॉक हृदयवाहिनीत यशस्वी अँजिओप्लास्टी; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘गोल्डन अवर्स’...

१०० टक्के ब्लॉक हृदयवाहिनीत यशस्वी अँजिओप्लास्टी; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘गोल्डन अवर्स’ ठरले जीवदायी


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील ६० वर्षीय महिलेवर हृदयाला जाणारा रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित झालेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तातडीने आणि यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. योग्य वेळी मिळालेल्या उपचारांमुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले असून, ही कामगिरी हृदयरोग उपचार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ठरली आहे.

भुसावळ येथील सुरेखा मोरे या महिलेला अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यासोबतच सतत उलट्या होत असल्याने प्रकृती झपाट्याने खालावत होती. वेदना वाढत गेल्याने नातेवाइकांनी विलंब न करता रुग्णाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या पथकाने ईसीजीसह सर्व अत्यावश्यक तपासण्या तात्काळ सुरू केल्या.

ईसीजी आणि रक्ततपासण्यांमधून रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका (मेजर हार्ट अटॅक) आल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासणीसाठी करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख रक्तवाहिनी तब्बल १०० टक्के ब्लॉक झाल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार अत्यंत जीवघेणा असून काही मिनिटांचा विलंबही प्राणघातक ठरू शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न करता तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ. सिध्देश्वर खांडे आणि डॉ. आकाश पवार यांनी रुग्णावर यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीत स्टेंट बसवून हृदयाला पुन्हा सुरळीत रक्तपुरवठा सुरू करण्यात आला.

शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. छातीतल्या वेदना कमी झाल्या, श्वसन सुरळीत झाले आणि रुग्णाला दिलासा मिळाला. या संपूर्ण प्रक्रियेत सुधाकर बिराजदार यांच्यासह नर्सिंग स्टाफने महत्त्वपूर्ण सहकार्य केले, तर शस्त्रक्रियेनंतरची काळजी डॉ. मनमिता रेड्डी, डॉ. रिषभ पाटील आणि डॉ. झिशान यांनी घेतली.

या यशस्वी उपचाराबाबत बोलताना निवासी डॉक्टर डॉ. सिध्देश्वर खांडे यांनी सांगितले की, छातीत दुखणे, उलट्या, घाम येणे आणि धाप लागणे ही हृदयविकाराची महत्त्वाची लक्षणे असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणे अत्यावश्यक आहे. वेळेत रुग्णालयात आणल्यामुळेच या रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound