धक्कादायक ! गुजरातमध्ये चांदीपूरा व्हायरसमुळे ४८ मुलांचा मृत्यू

अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. या व्हायरसमुळे ४८ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १२७ नवीन प्रकरणे दाखल झाली आहेत. अनेकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अरवली जिल्ह्यातील चांदीपुरम प्रकरणासंदर्भात केंद्र सरकारचे पथक पुण्याहून पोहोचले. ज्यांनी बाधित भागांना भेटी दिल्या. या पथकाने जिल्ह्यातील भिलोडा आणि मेघराज तालुक्यातील विविध भागातून रक्ताचे नमुने गोळा केले. हे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, हा धोकादायक व्हायरस गुजरात आणि राजस्थानमध्ये अधिक आढळून येत आहे. चांदीपुरा व्हायरस हा विशेषत: १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळतो. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, उलट्या आणि फ्लू ही त्याची लक्षणे आहेत. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस देखील होतो. ही एक स्थिती आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते.

या विषाणूचा संसर्ग दुर्मिळ असल्याने, त्यावर अद्याप योग्य उपचार नाही. मात्र वेळीच या आजाराची लक्षणे समजल्यास योग्य उपचार सुरू केल्याने, तो गंभीर होण्याचा आणि मेंदूशी संबंधित विकार होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो. १९६५ मध्ये नागपूर शहरातील चांदीपुरा येथे एका नवीन व्हायरस प्रादुर्भाव दिसून आला. १२ ते १५ वर्षे वयोगटातील अनेक मुलांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. हा व्हायरस देशात पहिल्यांदा नागपूरच्या चांदीपुरा गावातून आला होता, म्हणूनच या व्हायरसला चांदीपुरा व्हायरस म्हणून ओळखले जाते.

Protected Content