सांगली (वृत्तसंस्था) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी तासगाव- कवठे महांकाळमधून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलीय. यामुळे त्यांचा सामना माजी गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांच्यासोबत होणार आहे.
तासगाव येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलतांना सीमा आठवले यांनी म्हटले आहे की, तासगाव- कवठे महांकाळमधून निवडणूक लढण्यास तयार आहोत. एवढेच नाही तर तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीतून निधी खेचून आणू, अशी ग्वाही देखील सीमा आठवले यांनी दिली आहे. दरम्यान, तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघ राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील अर्थात आबांचा बालेकिल्ला आहे. आबा 2014 च्या निवडणुकीतही विजयी झाले. मात्र, त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अन् पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमन पाटील विजयी झाल्या. आताही राष्ट्रवादीकडून सुमन पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.